
मुंबईमध्ये (mumbai) पुढील काही दिवसांत तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. मुंबईतील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि लगतच्या परिसरासाठी उष्म्याबाबत ‘यलो अलर्ट’ (yellow alert) जारी केला आहे.
वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा इशारा दिला आहे. त्याच वेळी, महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेसारख्या या परिस्थितीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा (निर्जलीकरण) आणि उष्माघाताचा धोका वाढू शकतो.
यामुळे दुपारच्या वेळी थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे टाळावे, असा सल्ला प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता असली, तरी महाराष्ट्रातील इतर काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील काही भागांत हवामानात बदल (monsoon) होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पुरेसे पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेशन) कायम राखावे. सर्वाधिक उष्मा असलेल्या दुपारच्या वेळी घराबाहेरची अनावश्यक कामे टाळावीत.
हेही वाचा


