
मान्सूनच्या काळात अंधेरी सबवे परिसरात होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे. शहरी विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाला तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत अंधेरी सबवे, दाऊद बाग आणि आजादनगर परिसरातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला आमदार अमित साटम, मुरजी पटेल, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, मोगरा नाल्यामुळे होणाऱ्या पुरावर कायमस्वरूपी उपाय म्हणून नाल्याचा प्रवाह वळवणे, पाणीसाठा टाकी उभारणे आणि नाल्याची क्षमता वाढवणे अशा महत्त्वाच्या पर्यायांचा विचार केला जात आहे. या प्रकल्पासाठी आयआयटी मुंबईकडून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला जात असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
या उपाययोजनांमुळे मान्सूनमध्ये पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. यासाठी आवश्यक निधी प्रशासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा
मुंबई: 20 हॉटस्पॉटवर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई


