२०२५ च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याने यंदाही आपली शैक्षणिक प्रगती सिद्ध करत कोकण विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील निकाल ९३.७४% इतका लागला असून एकूण ९६,०८९ विद्यार्थ्यांपैकी ८९,८२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये मुलींचा निकाल ९५.०६% इतका असून मुलांचा निकाल ९२.४७% इतका आहे. यावरून स्पष्ट होते की मुलींनी यंदाही मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. फेरपरीक्षा दिलेल्या ८,७५० विद्यार्थ्यांपैकी ५,४२१ विद्यार्थी उत्तीर्ण होण्यात यशस्वी ठरले.
ठळक बाबी:
एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी: ९६,०८९
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी: ८९,८२७
शत-प्रतिशत निकाल: ९३.७४%
मुली उत्तीर्ण: ४६,९६५ (९५.०६%)
मुले उत्तीर्ण: ४८,२८३ (९२.४७%)
फेरपरीक्षेत यशस्वी विद्यार्थी: ५,४२१
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले, “हा निकाल हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या सहकार्याचे मूर्त स्वरूप आहे. परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये घेतलेल्या पारदर्शक उपाययोजनांचा हा ठळक परिणाम आहे.”

परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची पावले:
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे देखरेख
परीक्षा केंद्रांवर पूर्वतयारीने सर्व सुविधा उपलब्ध
परीक्षा केंद्रांच्या बाहेरील परिसरात व्हिडीओ चित्रीकरण
३२ केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके कार्यरत
Malpractices Act 1982 अंतर्गत कडक अंमलबजावणी
५०० मीटर परीसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवणे व कलम १४४ लागू करणे
विभागीय निकाल विश्लेषण:
शिक्षण विभागाने परीक्षेदरम्यान पारदर्शकता आणि शिस्त यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे परीक्षेचा संपूर्ण कालावधी शांततेत पार पडला. माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनीही यशस्वी नियोजनासाठी सर्व संबंधित शिक्षकवर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या निकालाने ठाणे जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रात आपली अग्रणी भूमिका पुन्हा सिद्ध केली आहे. शिक्षणप्रेमींसाठी आणि पालकांसाठी हे निश्चितच एक समाधानाचे चित्र आहे.
लेखक: सागर कदम
सहलेखक: किरण भालेराव